पालघर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा मध्यान्ह पोषण आहार प्रशासकीय दिरंगाईमुळे काही काळ ठप्प झाल्यानंतर अखेर त्यावरील मार्ग मोकळा झाला आहे. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत नव्या पुरवठादारांशी करार प्रक्रिया रखडल्यामुळे धान्य पुरवठा बंद पडला होता. परिणामी, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित मिळणाऱ्या शिजवलेल्या पोषण आहाराचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ३१ जुलै रोजी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी हातात रिकाम्या ताटल्या घेऊन ‘ताटली आंदोलन’ केले होते. या आंदोलनाची राज्य शासनाने गंभीर दखल घेत तातडीने धान्य पुरवठ्याचे आदेश जारी केले असून, राज्यभर पुन्हा पोषण आहाराचे वितरण सुरू झाले आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला नियमित शिजवलेला पोषण आहार मिळणे बंधनकारक असून, शासनाच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते चंद्रा जाधव यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या ताटात नियमित पोषण आहार पोहोचावा हा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट केले. शासनाने तातडीने निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या हक्काचा विजय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालघरमध्ये झालेल्या या आंदोलनानंतर शासनाने संबंधित पुरवठादारांना करार प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये धान्याचा पुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्यभर युद्धपातळीवर धान्य आणि पोषण आहाराचे वितरण सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या ताटात पुन्हा मध्यान्ह भोजन पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धान्य पुरवठा बंद झाल्यामुळे विशेषतः आदिवासी, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले होते. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेने राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसह ताटली मोर्चे काढले होते. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी राबविण्यात आलेल्या या आंदोलनानंतर शासनाने तातडीने निर्णय घेतल्यामुळे मध्यान्ह पोषण आहाराचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. संघटनेच्या मते, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या पोषणाच्या हक्कासाठी उभारलेल्या या आंदोलनामुळे शासनाला त्वरित निर्णय घ्यावा लागला आणि त्यातून राज्यभरातील शाळांमधील पोषण आहार वितरणाची व्यवस्था पुन्हा पूर्ववत झाली.

