पालघर : विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार केल्याच्या काही तासातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य व आवश्यक सहकार्य न मिळाल्याने या सगळ्यांचा दारुण पराभव झाला होता. याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी ठाणे व पालघर जिल्हा पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
पालघरच्या स्थानीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्याविरुद्ध थेट तक्रार केल्याचा राग मनात धरून अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर असणाऱ्या पाम गावातील कार्यालयात शिरून समीर मोरे यांना मारहाण केली तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अतिश मोरे यांना बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. समीर मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला अविनाश जाधव यांनी केलाच आरोप पालघर मधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आपण या घटनेची माहिती राज ठाकरे यांना देखील दिली असून ते आम्हाला न्याय देतील असा विश्वास चूरी यावेळी व्यक्त केला.