मुंबई : मलबार हिल येथील हिरवाई, शांतता आणि निसर्गसौंदर्यामुळे अल्पावधीतच मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेला निसर्ग उन्नत मार्ग (Nature Elevated Walkway) सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, हा मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. सिंगापूरच्या **‘ट्री टॉप वॉक’**च्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने मलबार हिल येथे उभारलेला हा ४८५ मीटर लांबीचा आणि २.४ मीटर रुंदीचा लाकडी मार्ग मार्च २०२५ मध्ये नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. घनदाट झाडीतून जाणाऱ्या या मार्गावर विविध प्रजातींची झाडे, वनस्पती, पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत होते. सुरू झाल्यापासून या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुमारे सात लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. तसेच महापालिकेला १ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून हा मार्ग बंद असल्याने पर्यटकांकडून सातत्याने चौकशी केली जात असून, महापालिकेलाही महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे.
१२ जून रोजी कर्णफळाच्या झाडाची मोठी फांदी या लाकडी मार्गावर कोसळून त्याचे नुकसान झाले होते. त्यावेळी मार्गावर सुमारे ३० ते ३५ पर्यटक उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन ते तीन दिवसांत मार्गाची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने तो बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या अभियंत्यांनी केलेल्या संरचनात्मक तपासणीत या परिसरात दरड कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मार्गावर तात्पुरती प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर फिरोजशाह मेहता उद्यानही काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. पावसाळ्यात टेकडीच्या उतारावरील माती वाहून जाणे किंवा दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने संरक्षणात्मक उपाययोजनांचा प्रस्ताव तयार केला असून, तो सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक कामे हाती घेतली जाणार असून, त्यानंतरच निसर्ग उन्नत मार्ग पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
