डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर-पाटकर रस्ता रिक्षा वाहनतळावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रिक्षाचालकांकडून प्रवाशांना भाडे नाकारले जात असल्याच्या आरोपामुळे बुधवारी रात्री प्रवाशांचा संताप अनावर झाला. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना रिक्षा मिळत नसल्याने संतप्त प्रवाशांनी केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर तब्बल अडीच तास ठिय्या आंदोलन करत रिक्षांची वाहतूक रोखून धरली. रिक्षा वाहनतळावर नियमितपणे रिक्षा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच चालकांनी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्याची हमी द्यावी, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. याशिवाय वाहनतळावर रिक्षा उपलब्ध होत नसल्यास केडीएमटीने या परिसरात बससेवा सुरू करावी आणि सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून संध्याकाळी सातनंतर केळकर रस्ता रिक्षा वाहनतळावर एकही रिक्षा उभी राहत नाही. विशेषतः पावसाच्या दिवसांत रिक्षाचालक या परिसरात येण्याचे टाळतात. दिवसभर शेअर रिक्षा चालवणारे अनेक चालक संध्याकाळी वाहनतळ सोडून जवळच्या चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर थांबून जास्त भाड्याच्या प्रवाशांची वाट पाहतात. वाहनतळावर उभे राहिल्यास शेअर पद्धतीने कमी भाड्यात प्रवासी न्यावे लागतात, तर थेट भाड्यात अधिक पैसे मिळत असल्याने नियमित प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनीही प्रवाशांच्या तक्रारींना दुजोरा देत, रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारले जात असल्याचे सांगितले. रिक्षाचालक वाहनतळाच्या बाजूने रिकाम्या रिक्षा घेऊन जात असले तरी प्रवासी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रवासी नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक विभागाला असतानाही संबंधितांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची टीका त्यांनी केली. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती देत, संध्याकाळच्या वेळेत जास्त भाडे मिळविण्याच्या स्पर्धेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
