मुंबई : पावसाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामं हाती घेतली आहेत. मात्र या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच कळवण्यात येतं. तसंच या कार्यवाहीत प्रशासनाला सहकार्य करून आपापली वाहने अशा ठिकाणांहून काढून घ्यावीत, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. झाडांच्या फांद्या छाटणीदरम्यान जर दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले, तर महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई महानगरात सर्व्हेक्षण केल्यानंतर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीचं उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र ही छाटणी सुरू असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. वाहनांचे नुकसान होवू नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी कळवण्यात येतं. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर महानगगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.