मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडत आहेत, असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यंदाच्या मान्सूनमध्ये झालेला मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि हवामानातील बदल ही झाडे कोसळण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, यावर्षी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून त्यासोबतच जोरदार वाऱ्यांचाही मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक झाडे तसेच झाडांच्या फांद्या कोसळल्या. वर्षभरात जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास ५० टक्के झाडे एका दिवसातच कोसळल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह विविध विकासकामे सुरू असली, तरी केवळ त्या कामांमुळेच झाडे पडत आहेत, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी नमूद केले. झाडे कोसळण्यामागे मुसळधार पाऊस, वेगवान वारे, जमिनीतील बदल आणि इतर नैसर्गिक घटकांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचप्रमाणे, यंदाच्या अतिवृष्टीमुळे काही भागांत पाणी साचले असले तरी त्यावरून नालेसफाई झाली नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा नालेसफाईचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यात आले होते. मात्र पावसाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले. नालेसफाई झाली नसती, तर शहरातील परिस्थिती यापेक्षाही अधिक गंभीर झाली असती, असे त्यांनी अधोरेखित केले.
अश्विनी भिडे यांनी मॅनहोल सुरक्षेबाबतही महत्त्वाची भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम झाला तसेच झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. काही नागरिकांचा मृत्यू झाला असून, उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईत सुमारे एक लाख मॅनहोल आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील सूक्ष्म स्तरावरील अंमलबजावणीत महापालिका कमी पडल्याची बाब प्रशासन स्वीकारत आहे. गेल्या चार वर्षांत विविध स्तरांवर काम झाले असले तरी मायक्रो लेव्हलवरील नियोजन आणि देखरेखीत काही त्रुटी राहिल्या. आता या बाबींवर विशेष भर देत सर्व मॅनहोलचे जिओ-टॅगिंग, नियमित तपासणी आणि अधिक कठोर कार्यपद्धती राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनावर करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत विचारण्यात आले असता, प्रशासन म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. राजकीय आरोपांवर भाष्य करणे आयुक्त म्हणून योग्य नाही. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात कोणताही विसंवाद नसून समन्वयाने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

