नवी मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने सुपर स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध दुर्लक्षित भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, त्यासोबतच नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सोसायट्या आणि वसाहतींमध्ये कचऱ्याचे चार प्रकारे वर्गीकरण करण्याची माहिती रहिवाशांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या अंतर्गत घणसोली सेक्टर ३० येथील यशोदीप हाइट्स सोसायटी तसेच सेक्टर ८ येथील गामी रिजन सोसायटीमधील रहिवासी आणि स्वच्छताकर्मींना कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यात आली. तसेच सेक्टर ६, समर्थनगर, घणसोली परिसरात स्वच्छता मोहिमेसोबतच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. परिसराची स्वच्छता करताना पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी उघड्यावर पडलेले टायर्स आणि इतर अनावश्यक साहित्य जमा करण्यात आले. करावेगाव, आग्रोळीगाव, दिघा विभागातील व्यावसायिक क्षेत्र, सेक्टर १६ मधील जय भवानी मार्केट, ऐरोली, जुहूगाव आणि महापेगाव या भागांतही अशाच प्रकारच्या विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे स्वच्छतेसोबतच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘सफाई अपनाओ–बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सखोल स्वच्छता मोहिमा, तर आरोग्य विभागामार्फत मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच मूषक नियंत्रण मोहिमा संयुक्तपणे राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या विशेष मोहिमा राबविण्यात येत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरात तसेच घराभोवती पाणी साचून राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. घराभोवती साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी टायर्स, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी किंवा इतर साहित्यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताप किंवा इतर तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. नवी मुंबई शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या मोहिमांसोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
