मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा खरेदी करण्याचा आणि त्यावर आर्थिकदृष्टया दुर्बलांसाठी ४ हजार घरांसह ८ हजार घरे बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार, संचालक (प्रशासन) प्रवीण कोळी, तांत्रिक संचालक अभिजित लोंढे, सहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते. बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची मेट्रो स्थानकाजवळ ६६ एकर खुली जागा असून दोन्हीची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. या आरक्षित जागेवर महाहौसिंगमार्फत परवडणाऱ्या घरांचा गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ही २८.८४ एकर आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन त्यावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्या दुर्बलांसाठी ४ हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच निवास आरक्षण अंतर्गत मध्य उत्पन्न गटासाठी ४ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी रुग्णालय, शाळा, सांस्कृतिक भवन, मैदान यासह व्यापारी गाळेही उभारण्यात येणार आहेत.

