मुंबई : मध्य रेल्वेने फेरीवाल्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मध्य रेल्वेवरून कोणत्याही वेळी प्रवास करा प्रवाशांना मात्र गर्दीचा सामना करावाच लागतो. आता अशातच मध्य रेल्वेने फेरीवाल्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने गर्दीने तुडुंब भरणाऱ्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृत परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या दोन्हीही मार्गांवर मिळून १०० अधिकृत फेरीवाल्यांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांची आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २०२३ मध्ये अशाच एका प्रस्तावाला प्रवासी संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यावेळी रेल्वेने या निर्णयाविरोधात माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता गुपचूप निविदा प्रक्रिया राबवून हे कंत्राट देण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कल्याण दरम्यान, तसेच हार्बर लाईनवरील लोकलमध्ये फेरीवाल्यांना विक्री करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला तीन वर्षांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवस्थेअंतर्गत, मध्य रेल्वेवर ५० आणि हार्बर रेल्वेवर ५० याप्रमाणे १०० अधिकृत विक्रेत्यांना लोकलच्या डब्यांमध्ये उपभोग्य (Consumable) आणि अनुपभोग्य (Non Consumable) अशा दोन्ही वस्तू विकण्याची परवानगी दिली जाईल.मिळालेल्या माहितीनुसार, कागदपत्रांमध्ये आधारकार्डची पडताळणी, पोलीस पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत ओळखपत्र जारी करणे यासह कठोर पात्रतेचे निकषही नमूद केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी प्रगत टप्प्यावर आहे. मार्च महिन्यात बीएमसीने एका विशेष मोहिमेअंतर्गत दादर मार्केटमधून हजारो अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले होते. पण, गेल्या महिन्याच्या ६ मार्च आणि ८ मार्च रोजी, जेव्हा पाहणी केली, तेव्हा अनेक विक्रेते फुटपाथवर धंदा करताना दिसून आले, अशी माहिती मिड- डेने दिलेली आहे. अनेक फेरीवाले बीएमसीची गाडी येताच, तिथून पळ काढतात. आपआपलं सामान घेऊन लगेचच तिकडून पळ काढतात.

