मुंबई : कोकणवासीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार असून, मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास मोठ्या प्रमाणात जलद होणार आहे. सध्या मुंबईहून सिंधुदुर्गपर्यंत रस्ते किंवा रेल्वेमार्गाने पोहोचण्यासाठी साधारण सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. मात्र नवीन विमानसेवा सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांना आपल्या गावी जाणे अधिक सोयीचे होणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, मोठ्या संख्येने गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती देताना सांगितले की, फ्लाय ९१ ही विमान कंपनी १५ ऑगस्टपूर्वी चिपी ते नवी मुंबई अशी सेवा सुरू करणार असून, त्यानंतर इंडिगोची विमानसेवाही या मार्गावर सुरू करण्याचे नियोजन आहे. या नव्या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असून, शनिवार आणि रविवार वगळता इतर दिवशी ही सेवा सुरू असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मुंबई–सिंधुदुर्ग थेट विमानसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना रस्ते किंवा रेल्वे मार्गाचा पर्याय स्वीकारावा लागत होता. आता नवी मुंबई विमानतळावरून थेट विमानसेवा सुरू झाल्यानंतर केवळ स्थानिक नागरिकांनाच नव्हे, तर व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही मोठा लाभ होणार आहे. समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. नवीन विमानसेवेच्या माध्यमातून मुंबईहून सिंधुदुर्गमध्ये जलद आणि सुलभ प्रवास शक्य होणार असल्याने पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढण्यासही या सेवेमुळे मदत होईल. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या हजारो भाविक आणि चाकरमान्यांसाठी ही विमानसेवा मोठा दिलासा ठरणार असून, प्रवासाचा वेळ वाचवण्याबरोबरच अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
