ठाणे : केंद्र शासनाच्या ‘NAMASTE Rural (National Action for Mechanised Sanitation Ecosystem)’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीत आयोजित या विशेष उपक्रमाचा उद्देश कचरा वेचक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रोफायलिंग करून त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, कौशल्य विकास आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्यामध्ये कचरा वेचकांचे सर्वेक्षण, प्रोफायलिंग, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, कौशल्य विकास तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी राज्यस्तरावर प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, गट विकास अधिकारी, जिल्हा सल्लागार, विस्तार अधिकारी, गट समन्वयक आणि समूह समन्वयक यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यानुसार विविध ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोन ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाला सरपंच रेखा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा सल्लागार दत्तात्रय सोळंके, मास्टर ट्रेनर ज्ञानेश्वर चंदे तसेच मोठ्या संख्येने कचरा वेचक आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना NAMASTE योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांचे प्रोफायलिंगही करण्यात आले.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना NAMASTE ओळखपत्र, वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit), आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण, लाभार्थ्यांच्या मुलांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, व्यावसायिक सुरक्षा व कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच District Waste Collection Centres (DWCCs) च्या माध्यमातून उद्योजक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन पंडित राठोड यांनी सांगितले की, या अभियानाचा उद्देश केवळ कचरा वेचकांचे सर्वेक्षण करणे नसून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी जोडून सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्याने प्रोफायलिंग, जनजागृती आणि लाभ वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचक हे समाजाच्या स्वच्छता व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत त्यांच्या सुरक्षिततेला, आरोग्याला आणि सामाजिक सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पात्र कचरा वेचक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के प्रोफायलिंग करून त्यांना NAMASTE योजनेतील सर्व लाभ मिळवून द्यावेत, तसेच संबंधित लाभार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामाजिक संरक्षण, आरोग्य सुरक्षा, कौशल्य विकास आणि सन्मानजनक रोजगारासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

