अहिल्यानगर : राज्यात दुधाच्या संकलनात झालेल्या घटेचा परिणाम आता दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारावर दिसू लागला आहे. विशेषतः खवा आणि पनीरच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली असून, गेल्या काही काळात किलोमागे ८० ते १०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी २८० ते ३०० रुपये किलो दरम्यान विकला जाणारा खवा आता ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुधाचा पुरवठा घटल्याने खवा आणि पनीर उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात या पदार्थांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना आगाऊ मागणी नोंदवूनच माल मिळवावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम नसल्याने मागणी तुलनेने सामान्य असली तरी पुरवठा कमी असल्याने दरांवर दबाव कायम आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकेकाळी दुधाचे संकलन ४० लाख लिटरपर्यंत पोहोचले होते. मात्र अलीकडील काळात त्यामध्ये झालेल्या घटेमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही पनीरच्या कमतरतेचा सामना करावा लागत असून येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या सुमारे ६ लिटर दुधापासून एक किलो शुद्ध खवा तयार होतो. सध्या गायीच्या दुधाचे दर ३८ ते ४० रुपये प्रतिलिटर असल्याने केवळ दुधाचाच खर्च सुमारे २४० रुपये येतो. यामध्ये इंधन, मजुरी आणि इतर उत्पादन खर्चाची भर पडत असल्याने खवा ३०० रुपयांपेक्षा कमी दराने विकणे व्यवहार्य ठरत नाही. त्याचप्रमाणे एक किलो पनीर तयार करण्यासाठी सुमारे ७ ते ८ लिटर दुधाची आवश्यकता असते. त्यामुळे दुधाच्या वाढत्या खर्चाचा थेट परिणाम पनीरच्या किमतीवरही होत असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.
