मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा करत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटी व तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा हप्ता न मिळालेल्या, मात्र पात्र असलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित महिलांनी या कालावधीत आवश्यक दुरुस्त्या करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यास कटिबद्ध असून, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, योजनेतील मासिक आर्थिक मदत वाढविण्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता, हप्त्यात वाढ करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि योग्य वेळी सरकारची भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरही माध्यमांसमोर भाष्य केले.
