ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारा टँकर जप्त केला. या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ असे लिहिण्यात आले होते. गोपनीय माहितीच्या आधारे मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून टाटा कंपनीचा टँकर (MH-46-BB-7134) अडवण्यात आला. तपासणीदरम्यान टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. चालकाकडे या पदार्थाच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. त्यानंतर शिधावाटप अधिकारी सुभाष रामनाथ डुंबरे आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. संयुक्त तपासणीत टँकरच्या पाच कप्प्यांमध्ये २५ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळला. जप्त मुद्देमालामध्ये २४.५ लाख रुपयांचे इंधन आणि २२ लाख रुपये किमतीचा टँकर समाविष्ट आहे.
प्राथमिक तपासात आरोपींनी विरार खाडी किनाऱ्यावरून बोटीमार्फत डिझेल आणून ते टँकरमध्ये भरल्याची माहिती समोर आली आहे. हे इंधन नाशिकच्या दिशेने नेण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थ वाहतुकीचे कोणतेही सुरक्षामानदंड न पाळता सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७, रा. वाशी) याला अटक करण्यात आली असून टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग यांच्यासह आणखी सात जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधावाटप अधिकारी सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पिरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उटेकर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सरजेराव मस्के-पाटील यांनी नागरिकांना इंधन साठा करण्याची गरज नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

