वृत्तसंस्था : दररोजच्या जीवनात चहा हा अनेकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभरातील थकवा घालवण्यासाठी, अनेक जण दिवसातून तीन ते चार वेळा चहा पितात. मात्र Tea पिण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे काही सवयी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. विज्ञान आणि आयुर्वेदाच्या मते, चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. चहाचा स्वभाव आम्लीय (ॲसिडिक) असल्यामुळे उपाशीपोटी चहा घेतल्यास शरीरातील आम्लाची पातळी वाढू शकते. अशावेळी चहा पिण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यायल्यास पोटात एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास कमी होतो. तसेच चहामधील टॅनिनमुळे दातांवर पडणारे डाग कमी करण्यासही मदत होते. याशिवाय चहा हा शरीरातील पाणी कमी करणारा (मूत्रल) पेय असल्याने आधी पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते.
दुसरीकडे, चहा पिल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. गरम चहानंतर लगेच थंड किंवा साधं पाणी घेतल्याने दातांच्या एनॅमलवर परिणाम होतो आणि दातांची संवेदनशीलता वाढू शकते. तसेच आयुर्वेदानुसार गरम आणि थंड पदार्थांचा एकत्रित परिणाम शरीराच्या तापमानावर होऊन पचनक्रिया बिघडू शकते. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे अन्न पचण्याची प्रक्रिया मंदावते आणि गॅस, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे चहा पिल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांचा अंतर ठेवूनच पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते.

