ठाणे : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या अनेक चालकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवाशांशी संवाद साधताना अनेकदा अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. भाषेच्या अडथळ्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात वादाचे प्रकारही घडत होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला असला, तरी राज्य सरकारने मराठी शिकण्यासाठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्ये, प्रवाशांशी संवाद साधण्याची पद्धत आणि आवश्यक भाषिक प्रशिक्षण देण्यात आले. मुदत संपल्यानंतर आता प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ठाण्यात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईसाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ठाणे रेल्वे स्थानक, माजिवडा, वागळे इस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात तपासणी करण्यात येत आहे. पथकांकडून रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्याशी थेट मराठीत संवाद साधला जात आहे. चालकाला व्यावहारिक मराठी बोलता येत असल्यास त्याला पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. मात्र, मराठीत संवाद साधता न आल्यास संबंधित चालकाला अधिकृत नोटीस बजावली जात आहे. या नोटिशीद्वारे संबंधित चालकाला मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जात आहे. या कालावधीनंतर पुन्हा त्याची मराठी संवाद क्षमता तपासली जाईल. त्यावेळीही चालकाला मराठीत संवाद साधता आला नाही, तर त्याचा अधिकृत बॅज निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी सांगितले की, प्रवाशांशी व्यावहारिक मराठीत संवाद साधणे ही चालकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान मराठी न बोलणाऱ्या चालकांना तातडीने दंड न करता प्रथम सुधारण्याची संधी दिली जात आहे. महिनाभराची मुदत संपल्यानंतर पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतरही मराठी न आल्यास बॅज निलंबित करण्याची कारवाई केली जाईल. परिवहन विभागाच्या या कारवाईमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये मराठी शिकण्याबाबत जागरूकता वाढली असून, अनेक चालकांनी मराठी शिकण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही दिसून येत आहे. राज्य सरकारचा उद्देश दंडात्मक कारवाई करणे नसून, प्रवाशांना त्यांच्या मातृभाषेत संवादाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि सेवा अधिक सुलभ करणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात ठाण्यानंतर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही अशी तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. त्यामुळे सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आत्मसात करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

