ठाणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराविरोधात सुरू केलेल्या कठोर मोहिमेचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ठाणे शहरातील अनेक चायनीज विक्रेत्यांनी पदार्थांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम लाल खाद्यरंग पूर्णपणे बंद केले असून, त्याऐवजी बीट आणि काश्मिरी लाल मिरचीसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या कृत्रिम रंगांच्या वापराला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील रस्ते, पदपथ तसेच विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि दुकाने आहेत. या ठिकाणी नूडल्स, मंच्युरियन, फ्राईड राईस आणि इतर पदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी कृत्रिम लाल रंगाचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अशा रंगांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान केवळ तपासणीच नव्हे, तर विक्रेत्यांना सुरक्षित अन्नपदार्थ तयार करण्याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. कोणते घटक वापरावेत, कोणते टाळावेत, नैसर्गिक पर्यायांचा वापर कसा करावा आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे, याबाबत विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
एफडीएच्या कारवाईनंतर अनेक विक्रेत्यांनी कृत्रिम रंगाचा वापर बंद केल्याचे सांगितले आहे. चायनीज विक्रेते सचिन आढाळ यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर कृत्रिम खाद्यरंगासोबतच अजिनामोटो आणि काही प्रकारच्या सिझनिंग पावडरच्या वापरावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून विक्रेतेही आता नैसर्गिक पर्याय स्वीकारत आहेत. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, पदार्थांना आकर्षक रंग देण्यासाठी आता बीटाचा रस तसेच काश्मिरी लाल मिरचीची पेस्ट वापरली जात आहे. यामुळे पदार्थांचा रंग नैसर्गिकरीत्या उठून दिसतो आणि कृत्रिम रसायनांचा वापर टाळला जातो. विशेष म्हणजे, या बदलामुळे पदार्थांच्या चवीत कोणताही फरक पडत नसल्याचेही अनेक विक्रेत्यांनी सांगितले. ग्राहकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. कृत्रिम रंगाचा वापर बंद झाल्याने अन्न अधिक सुरक्षित झाल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. आपण कोणते अन्न खात आहोत आणि त्यात कोणते घटक वापरले जात आहेत, याबाबत नागरिकांनीही जागरूक राहणे आवश्यक असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. एफडीएने अलीकडच्या काळात राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, डेअरी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबवली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाने निलंबित करणे, दंडात्मक कारवाई करणे आणि सुधारणा करण्याचे आदेश देणे अशा उपाययोजना सातत्याने सुरू आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम खाद्यरंगांचा दीर्घकाळ वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे नैसर्गिक घटकांचा वापर हा अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो. ठाण्यातील विक्रेत्यांनी स्वीकारलेला हा बदल इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो. एफडीएच्या कठोर भूमिकेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढत असून, ग्राहकांनाही अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध होण्यास मदत होत आहे. आगामी काळातही कृत्रिम खाद्यरंग, भेसळयुक्त पदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

