नाशिक : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेनंतर अनेक हॉटेलांच्या मेन्यूमधून पनीरचे पदार्थ अचानक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अन्न व औषध पुरवठा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात भेसळविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या असून, त्याचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. पनीर चिल्ली, पनीर मसाला, पनीर तडका, कढई पनीर यांसारखे लोकप्रिय पदार्थ अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे ग्राहकांना आढळत आहे. यामागे पनीरचा तुटवडा असल्याचे कारण दिले जात असले तरी, अनेक हॉटेलांमध्ये शुद्ध पनीरच्या नावाखाली कमी किमतीचे अॅनालॉग पनीर वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केल्यानंतर बोगस पनीर आणि इतर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा कमी झाला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पनीरचे पदार्थ मेन्यूमधून गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून विविध हॉटेलांची तपासणी करून नमुने घेतले जात असून, नियमभंग आढळल्यास कारवाई केली जात आहे.
दरम्यान, शुद्ध पनीरची उपलब्धता मर्यादित झाल्याने त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. नाशिकमध्ये शुद्ध पनीरचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुधाच्या वाढलेल्या किमती आणि शुद्ध पनीरच्या वाढत्या मागणीमुळे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमध्ये वापरले जाणारे बहुतांश पनीर इंदूर, मध्यप्रदेश तसेच इतर राज्यांतून येते. प्रशासनाच्या तपासणीमुळे कमी दरातील आणि संशयित गुणवत्तेच्या पनीरचा पुरवठा घटला असून, अनेक हॉटेल चालक आता शुद्ध पनीर वापरण्याकडे वळले आहेत. त्यामुळे मागणी वाढून बाजारभावही चढले आहेत. काही हॉटेल व्यावसायिकांनी आपण गेल्या अनेक वर्षांपासून केवळ शुद्ध दुधापासून तयार केलेले पनीरच वापरत असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाच्या तपासणीनंतर काही हॉटेलांना ‘आम्ही अॅनालॉग पनीर वापरत नाही’ असे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मंगेश माने यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. पनीरसह विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात असून, भेसळ आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

