विरार : वसई विरार महापालिकेने बाजार कर उत्त्पन्न वाढीवर भर दिला आहे. कर वाढीसाठी २०२६-२८ या तीन वर्षांसाठी नव्याने ठेकेदार नियुक्त केले आहेत. नव्या ठेकेदारांसह कराच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे पालिकेला ४० कोटी ४५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणार असून पालिकेच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. शहरातील वाढत्या प्रकल्पांवर होणारा खर्च आणि वर्षानुवर्षे थकलेली कराची वसुली यामुळे वसई विरार महापालिकेने उत्पन्नाचे विविध स्त्रोत विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध मार्गाने उत्त्पन्न कसे वाढेल, याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी चालू वर्षात बाजार उत्पन्न करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार शहरात दैनंदिन व आठवडी बाजार भरतात. या बाजारात मोठ्या संख्येने फेरीवाले विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी बसतात. तर काहीजण खाद्यपदार्थ विक्री करतात. या फेरीवाल्यांकडून महापालिका बाजार कर वसूल करते त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. सद्यस्थितीत महापालिकेच्या दप्तरी २५ बाजारांची नोंद असून त्यातील २ बाजार बंद आहेत.
बाजार कर उत्त्पन्नात वाढ व्हावी यासाठी तीन वर्षासाठी तीन ठेकेदार नियुक्त करून बाजार कर वसुली सुरू केली आहे. यापूर्वी महापालिकेला २०२५-२६ मध्ये ६ कोटी २३ लाख रुपये उत्त्पन्न मिळाले आहे. मात्र आता तीन वर्षासाठी जो ठेका काढला आहे त्यातून ४० कोटी ४५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी कराची जी रक्कम होती ती विना जीएसटी वसूल केली जात होती. मात्र, आता विविध महापालिकांच्या धोरणांचा अभ्यास करून नवीन बाजार कर धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त ( बाजार विभाग ) अजित मुठे यांनी दिली आहे. प्रभाग समिती ए व सी चा ठेका राम कैलास यादव या ठेकेदाराला देण्यात आला असून या प्रभागातून ८ कोटी ९६ लाख ८७ हजार उत्पन्न मिळणार आहे. तर प्रभाग समिती बी, ई आणि एच चा ठेका आर.एस.एंटरप्रायझेस या ठेकेदाराला दिला असून ९४ कोटी ९१ लाख इतके उत्पन्न मिळणार आहे. तसेच प्रभाग समिती एफ, जी आणि आय चा ठेका के. इन्फ्रा या ठेकेदाराला देण्यात आला असून या प्रभागातून १६ कोटी ८४ लाख उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. वसई विरार महापालिकेने २०२६ मध्ये बाजार करात वाढ केली आहे. पूर्वी पालिकेकडून ४० ते ५० रुपये इतका कर आकारला जायचा. पण, नव्याने लागू केलेल्या करत जीएसटी कर धरून आता ९० ते १०० रुपये फेरीवाल्यांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेकडून आकारण्यात येणारा कर अवाजवी असून तो रद्द करण्यात यावा अन्यथा फेरीवाल्यांकडून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात अनधिकृत आठवडी बाजारांचे पेव वाढत आहे.शहरात विविध ठिकाणी असे बाजार भरविले जात असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता यासह इतर समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. मात्र अशा अनधिकृत बाजारांकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

