मुंबई : मासिक पाळीदरम्यान होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन त्या काळात महिलांना रजा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राज्यात महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता नसणे हा महिलांचा अपमान असल्याचेही संघटनेने म्हटले.
कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्नाटक हे व्यापक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात हा विषय केवळ चर्चेच्या पातळीवरच असल्याची टीका राज्य शिक्षक परिषदेने केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदींना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात समृद्ध राज्य असले तरी महिलांच्या आरोग्यविषयक व संवेदनशील विषयावर अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही. ही बाब महिलांचा अवमान करणारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात रजा देय ठरवून महिलांचा सन्मान करावा, अशी महिला शिक्षक कर्मचाऱ्यांची अपेक्षा असल्यामुळे त्यांनी त्या काळात रजा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

