पुणे : राज्य मंडळाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम अद्याप सुरू आहे. शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांच्या अंतिम मंजुरीला झालेल्या विलंबाचा परिणाम विशेषतः इयत्ता सहावीच्या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेवर झाला आहे. तरीही शाळा सुरू होणाऱ्या १५ जून रोजी विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी ‘बालभारती’ने विशेष नियोजन केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम आराखडा तयार केला असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ने पुस्तक निर्मितीची जबाबदारी पार पाडली आहे. तज्ज्ञ समित्या, परीक्षण प्रक्रिया आणि विविध मान्यतांच्या टप्प्यांनंतर पुस्तकांची निर्मिती पूर्ण करण्यात आली असली तरी अंतिम मंजुरी उशिरा मिळाल्याने काही पुस्तकांच्या छपाईला विलंब झाला.
बालभारतीच्या माहितीनुसार इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीची बहुतांश पाठ्यपुस्तके तयार झाली असून उर्वरित पुस्तकांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. तसेच इयत्ता सहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतील पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील अभ्यासक्रम बदलानंतर साधारणपणे एका वर्षात एक किंवा दोन इयत्तांची पुस्तके तयार केली जातात. मात्र, बालभारतीच्या इतिहासात प्रथमच एकाच वर्षात चार इयत्तांची नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. यंदा १० माध्यमांतील एकूण ३४८ पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून छपाई आणि वितरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या सर्व माध्यमांतील व सर्व विषयांची पाठ्यपुस्तके ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसह विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

