नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची पोस्ट शेअर केली जात आहे. मात्र, सरकारने या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक फॅक्ट-चेक रिपोर्ट जारी करून स्पष्ट केले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) ने मार्च २०२६ पर्यंत ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी असून, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ५०० रुपयांच्या नोटा अजूनही पूर्णपणे वैध आहेत आणि कोणत्याही व्यवहारात त्या वापरल्या जाऊ शकतात.
PIB ने आपल्या अधिकृत X हँडलवरून या अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करेल. PIBFactCheck: हा दावा खोटा आहे! RBI ने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.” PIB ने नागरिकांना विनंती केली आहे की, कोणतीही बातमी खरी मानण्यापूर्वी किंवा ती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी. ५०० रुपयांच्या नोटा बंद झालेल्या नाहीत आणि त्या अजूनही कायदेशीररित्या वैध आहेत.

