ठाणे : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबविण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या अंतर्गत शहापूर तालुक्यातील पिवळी केंद्रातील नऊ शाळांमध्ये मोफत वही वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाद्वारे खोर, पिवळी, वांद्रे, कोशिंबडे, रताळेपाडा, सावरोली, वेडवहाळ आणि वेहलोंडे येथील जिल्हा परिषद शाळांसह किल्लेमाऊली माध्यमिक शाळेतील एकूण १,०५० विद्यार्थ्यांना सुमारे ३,१०० मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची भावना पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले. जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिजाऊ संघटना शहापूर तालुका प्रमुख तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, मुंबई म्युनिसिपल बँकेचे संचालक भानुदास भोईर, कुणबी सेनेचे शहापूर तालुका प्रमुख जगन निपुर्ते, जिजाऊ संस्थेचे सुदर्शन पाटील आणि सुनील निपुर्ते, शिवसेना उपतालुका प्रमुख अमय भाटी तसेच किशोर धसाडे, विनोद निमसे, यशवंत वाख, आशिष कटारे, रुपेश भोईर यांच्यासह जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना दिनेश निमसे यांनी जिजाऊ संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली संस्था शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने जनहिताचे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हातात वही देणे म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी बळ देण्यासारखे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिक्षण ही समाजपरिवर्तनाची महत्त्वाची ताकद असून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास करावा तसेच भविष्यात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. जिजाऊ संस्थेच्या ३५ लाख मोफत वही वाटप अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आवश्यक ते बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

