ठाणे : शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्य जनतेचे लोकसेवक असून, गरजू नागरिकांसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेने काम करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा सादर केला.
यावेळी मार्गदर्शन करताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाने शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी संवेदनशील आणि लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरिकांचे रक्षक म्हणून कार्य करत मानवी मूल्ये जपत पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनावधानाने झालेल्या चुका क्षम्य असल्या तरी हेतुपुरस्सर, निष्काळजीपणे किंवा बेफिकीरपणे झालेल्या चुका कोणत्याही परिस्थितीत माफ केल्या जाणार नाहीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी आणि सीमांकनाची प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे नमूद करून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात भविष्यात अधिक लोकाभिमुख, नाविन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कामे होतील, असा विश्वास व्यक्त केला.

