मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता १०वीची मुख्य लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून राज्यभर सुरू होत आहे. या परीक्षेसाठी यंदा राज्यातील ९ विभागीय मंडळांमधून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, १८ मार्च २०२६ पर्यंत हा परीक्षा उत्सव चालणार आहे.
- १६,१५,४८९ विद्यार्थी.
- ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी.
- २३,६८३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ५,१११ मुख्य केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे.
- पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागांमध्ये परीक्षा पार पडेल.
बारावीच्या परीक्षेत समोर आलेल्या कॉपी प्रकरणांनंतर बोर्डाने १० वीसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यातील १९१ केंद्रे ‘संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आली असून, तिथे जिल्हा दक्षता समितीचे विशेष लक्ष असेल. बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, मात्र तांत्रिक कारणांमुळे ५५४ केंद्रांवर ही यंत्रणा उपलब्ध होऊ शकली नाही. तिथे जादा बैठे पथके तैनात करण्यात आली आहेत. एका छोट्या चुकीमुळे तुमचे वर्ष वाया जाऊ शकते, त्यामुळे खालील गोष्टी परीक्षा केंद्रावर नेण्यास सक्त मनाई आहे:
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे:मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळ, कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ, हेडफोन किंवा पेन ड्राईव्ह.
- साहित्य:पुस्तके, वह्या, कागदाचे तुकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या चिठ्ठ्या.
- इतर वस्तू:पाकीट (वॉलेट), हँडबॅग, कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक चष्मे.
हॉल तिकीट, पेन, पेन्सिल आणि इतर आवश्यक साहित्य घरातून निघण्यापूर्वी तपासून घ्या. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळणाऱ्या वेळेचा उपयोग उत्तरे आराखण्यासाठी करा. शेवटच्या क्षणी नवीन धडे वाचण्यापेक्षा, जो अभ्यास झाला आहे त्यावर विश्वास ठेवा. शांत डोक्याने उत्तरे लिहिल्यास गोंधळ टाळता येतो.

