मुंबई : महानगरपालिकेच्या फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुंबईत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दादरमधील रस्ते स्वच्छ, नीटनेटक्या स्वरूपात दिसत आहेत. घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच, काही प्रमुख पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे अनेक रस्ते व पदपथ फेरीवालामुक्त झाले झाल्याने नागरिकांसाठी सुरक्षित, मोकळ्या व अडथळारहित मार्गाने चालण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या समन्वयाने स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेकडून स्वच्छता मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, क्षेत्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा उंचावला असून आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रशासकीय विभागात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे सार्वजनिक स्वच्छता कार्यवाहीला आणखी व्यापक स्वरुप देत नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दादरमधील फेरीवाल्यांची समस्या कमी करण्यासाठी व स्वच्छतेसाठी पालिकेने पुढाकार घेतला असून फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. परिणामी, तेथील रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मोकळे झाले आहेत. याबाबत जी उत्तर विभागातील रहिवाशांनी घनकचरा व्यवस्थापन तसेच फेरीवाल्यांसंदर्भातील प्रश्न सुटल्याने पालिकेचे कौतुक केले आहे. सकारात्मक सुधारणा भविष्यातही कायम राहील आणि इतर दीर्घकालीन प्रलंबित नागरी समस्यांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

