ठाणे : ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि.मी व्यासाची वॉल्व नादुरूस्त झाला आहे. परिणामी या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. येथे नवीन वॉल्व बसविण्यासाठी शुक्रवारी काही भागांतील पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.
शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तक नगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागांत १२ तास पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. यापूर्वी ३० डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाण्याच्या टाकीच्या गळती होणाऱ्या इनलेटवर तातडीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली होती. केडीएमसीने स्पष्ट केले होते की, हा पाणीपुरवठा बंद केवळ दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या कालावधीपुरता मर्यादित असेल आणि प्रणाली स्थिर झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

