आश्चर्यचकित करणारी घटना उजेडात आली आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासणी अहवालात असे नमूद झाले आहे की, या अधिकाऱ्यांनी सरकारी दस्तऐवजांमध्ये बदल केला तसेच भूमिगत केबलविषयीचे पत्र लपवले.
आंबेजोगाई तालुक्यातील पूस या गावात खासगी जमिनीतून वीजवाहिनी टाकण्यासाठी महावितरणकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीदरम्यान अधीक्षक अभियंत्यांनी शासकीय कागदपत्रांमध्ये बदल केला आणि महत्त्वाचे पत्र लपवले. यामुळे पोलीस अधीक्षकांची दिशाभूल झाली.
या प्रकरणात अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही, गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांची फसवणूक केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी श्रीकर फड यांनी केली आहे.
