मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. ₹१,०८,५९९ कोटी गुंतवणुक मूल्य असलेल्या या करारांमुळे ४७,१०० रोजगार निर्मिती होईल. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
विविध सामंजस्य करारांचे तपशील :
- औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअॅलिटी यांच्यावतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ₹५००० कोटींची गुंतवणूक केली जात असून, यातून १०,००० रोजगार निर्मिती होईल.
- ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडकडून ₹३०,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, या डेटा सेंटर पार्कमुळे ६००० रोजगार निर्मिती होईल.
- नागपूर जिल्ह्यातील लिंगा कलमेश्वर या ठिकाणी एकात्मिक पृष्ठभाग कोळसा वायूकरण आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह प्रकल्प उभारणीसाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडून ₹७०,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, यातून ३०,००० रोजगार निर्मिती होईल.
- नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांच्या प्रकल्पासाठी पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ₹२०८६ कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, यातून ६०० रोजगार निर्मिती होईल.
- काटोल, नागपूर येथे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून खाद्य पेये आणि अन्न उत्पादनांच्या एकात्मिक सुविधा प्रकल्प निर्मितीसाठी ₹१५१३ कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, याद्वारे ५०० रोजगार निर्मिती होईल.
यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

