मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेस्ट बस सेवा बंद केल्यानंतर आता उद्यान प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी तेथे ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र, या गाड्यांच्या तिकीट दरावर अनेकांनी आक्षेप घेतला असून प्रशासनाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. दरम्यान, तिकिटांच्या विक्रीतून जमा होणाऱ्या महसुलातून देखभाल – दुरुस्ती केली जाते. ही बाब लक्षात घेऊन बसचे दर निश्चित करण्यात आल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ई-बसच्या वाढीव तिकीट दरामुळे पर्यटक, तर बसमधून प्रवास करण्यास मनाई असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालय आणि उच्चाधिकार समितीच्या आदेशानुसार पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने बोरिवली स्थानक ते कान्हेरी गुंफादरम्यान धावणारी वातानुकूलित बेस्ट बस सेवा १७ जानेवारीपासून पूर्णत: बंद केली. पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या बसमार्गाचे प्रवर्तन बंद करण्यात आले. त्यांनतर कान्हेरी गुंफा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशासनाने पाच ई – बसगाड्या सुरू केल्या. ही सेवा केवळ पर्यटकांसाठी असल्याने तेथील स्थानिकांना पायपीट करत घर गाठावे लागते. संबंधित बस राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर चालविण्यात येत असून बसगाड्यांचे तिकीट दर प्रति प्रवासी १०० रुपये इतके आहे. राष्ट्रीय उद्यानात बेस्ट बस चालवू नयेत, याबाबत न्यायालयाने मे १९९७ मध्येच आदेश दिले आहेत, असा दावा राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने केला. मात्र, त्यानंतरही बेस्ट बसची सेवा सुरूच होती. बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) आणि कान्हेरी गुफादरम्यान वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ए-१८८ सुरू होती. जानेवारीमध्ये ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. बेस्ट बसमधून प्रवासासाठी साधारणपणे १५ ते २० रुपयांदरम्यान तिकीट दर होता. मात्र, आता प्रशासनाच्या ई बसचे दर प्रति व्यक्ती १०० रुपये असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाडेवाढीमुळे पर्यटक संख्या कमी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

