ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २००८ मधील एका जुन्या प्रकरणासाठी ठाणे कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. २००८ मधील जुन्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे आज (११ डिसेंबर) ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या कोर्टात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर “मला गुन्हा कबूल नाही” असं स्पष्ट केलं. यावर न्यायालयानं प्रकरणावर लवकर तोडगा काढायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांना महत्त्वाचे निर्देश दिले. “तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यायची गरजही लागणार नाही,” असं न्यायालयानं यावेळी म्हटलं.
२००८ मध्ये रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठं नुकसान केलं होतं, असा आरोप होता. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे हे पहिल्यांदाच न्यायालयात हजर झाले होते. समन्स बजावल्यानंतर गुरुवारी सकाळीच राज ठाकरे न्यायालयात हजर झाले. यावेळी अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील न्यायालयात हजर होते .सुनावणीच्या सुरुवातीला ओळख पटवून दिल्यानंतर न्यायाधीश यांनी राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का? असा सवाल केला. यावर राज ठाकरे यांनी “नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी “आपण सहकार्य केल्यास एका महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करू” असं राज ठाकरे यांना सांगितलं.

