ठाणे : नौपाडा येथील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मंडईत गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दुर्घटनेत सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५३) आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा मृत्यू झाला, तर दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महापौर शर्मिला पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के आणि सौरभ राव यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जखमी अग्निशमन कर्मचारी सुजित पष्टे आणि समीर जाधव यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मंडईतील १५५ गाळेधारकांचे १ जूनपर्यंत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सद्यस्थितीत गावदेवी भाजी मंडई परिसरात साफसफाईचे काम सुरू असून त्यानंतर इमारतीची रचना, विद्युत व्यवस्था आणि अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे. रंगरंगोटी व आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर गाळेधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच आपत्कालीन आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्याबाबतही चर्चा झाली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जखमी अग्निशमन कर्मचारी सुजित पष्टे आणि समीर जाधव यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या तसेच राज्य शासनाच्या आपत्कालीन विभागामार्फत अतिरिक्त मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
