पुणे : मागील चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. पुणे–मुंबई मार्गावरील दरड कोसळल्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे–मुंबई बस सेवा पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी एकही एसटी बस सध्या सोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सततचा पाऊस, वेगवान वारे आणि महामार्गावरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी सध्या या मार्गावरील प्रवासाचे नियोजन टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आज सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या चारही बस सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत पाठविण्यात आल्या. विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले की, पुणे–मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन्ही शहरांदरम्यानची एसटी वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रस्ता पूर्णपणे साफ होऊन वाहतुकीसाठी सुरक्षित घोषित होईपर्यंत कोणतीही बस सेवा सुरू केली जाणार नाही. त्यांनी प्रवाशांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच पर्यायी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत माहितीची खात्री करण्याचे आवाहन केले. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर संबंधित यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून असून, मार्ग सुरक्षित होताच पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
