ठाणे : इस्त्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे उपहारगृह, खाणावळ या व्यवसायांसह आता लग्न समारंभ हॉल सभागृहावर देखील याचा फटका बसू लागला आहे. एप्रिल आणि मे महिना लग्न समारंभासाठी महत्वाचे महिने असून लग्न समारंभाची दोन महिने आधीच आगाऊ नोंदणी झाली आहे. परंतू, गॅस पुरवठा टंचाईमुळे ठाणे तसेच उपनगरातील अनेक हॉल व्यावसायिकांवर मोठ-मोठे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ ओढावली आहे. लग्न सोहळ्यासाठी एप्रिल आणि मे महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दोन महिन्यात लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असतात. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२६ एप्रिलमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त पाच आहेत. तर, मे महिन्यात नऊ शुभ मुहूर्त आहेत. यासह काही काढीव मुहूर्त देखील असतात. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक लग्न सोहळे पार पडत असतात. या लग्न समारंभासाठी वर आणि वधू यांच्या कुटूंबियांकडून दोन ते तीन महिने आधीच हॉलची नोंदणी केली जाते. त्यानुसार, ठाणे शहरासह आसपासच्या शहरातील १००-२०० लोकांच्या क्षमता असलेल्या हॉल पासून ते अगदी ५०० ते १००० लोकांच्या हॉल मध्ये या मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यातील लग्न सोहळ्याची नोंदणी झाली आहे. कुठे २०० माणसांसाठी तर, कुठे ५०० हून अधिक माणसांसाठी ही नोंदणी झाली आहे.
गेले काही दिवसांपासून सुरु असलेल्या गॅस पुरवठा टंचाईमुळे खाणावळ, उपहारगृहांसह आता लग्न समारंभ हॉल व्यावसायिक देखील चिंतेत पडले आहेत. ठाण्यातील एका लग्न समारंभ हॉल च्या व्यावसायिकाने सांगितले की. ‘आमच्याकडे २०० पर्यंत माणसांसाठी लग्न सोहळ्याची नोंदणी आली आहे. सध्या तीन ते चार दिवस पुरेल इतका गॅस पुरवठा आहे. परंतू, नंतरच्या लग्न समारंभासाठी आम्हाला ईलेक्ट्रिक शेगडी किंवा चुलीवर जेवण बनवण्या पलीकडे पर्याय नाही.’ तर, काही बड्या सभागृहांमध्ये ५०० हून अधिक माणसांच्या लग्न सोहळ्याची नोंदणी झाली आहे. गॅस पुरवठा टंचाई असताना, या लग्न सोहळ्यातील जेवणाची ऑर्डर कशी पूर्ण करायची असा प्रश्न सभागृह चालकांवर निर्माण झाला आहे. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे मोठ्या थाटामाटात लग्न सोहळे पार पडत असतात. या हॉल मध्ये पुढील १५ दिवसांसाठी ४० लग्नाच्या तसेच साखरपुडा, वाढदिवस सोहळा असे काही छोट्यामोठ्या कार्यक्रमांची नोंद झालेली आहे. परंतू, या हॉल चालकांना देखील गॅस टंचाईची समस्या येत्या काही दिवसात भेडसावण्याची चिन्हे आहे. त्यांच्याकडे तीन ते चार दिवस पुरेल इतकाच गॅस पुरवठा शिल्लक आहे. यावर पर्याय म्हणून त्यांनी देखील पारंपारिक पद्धतीने चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, ज्या मोठमोठ्या म्हणजे पाचशे ते सातशे किंवा १ हजार माणसांच्या ऑर्डस आहेत त्या संबंधित व्यक्तीसोबत चर्चा करुन त्या पुढे ढकलता येतील का? किंवा माणसांची संख्या काही कमी करता येईल का ? याबाबत फेरविचार सुरु आहे. या परिस्थितीमुळे आमचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत टीप टॉप चे मालक जयदीप शहा यांनी व्यक्त केली आहे.

