मुंबई : मुंबईकरांची कमी पैशांमध्ये भूक भागवणारा पदार्थ म्हणून वडापावला चांगलीच मागणी असते. खिशात मोजके पैसे असले तरी वडापावच्या जीवावर अनेकजण पूर्ण दिवस काढतात. त्यामुळे कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट पर्यंत सगळीकडे वडापावचे चाहते असतात. मात्र , मुंबईकरांची भूक भागवणारा हा वडापाव आता संकटात आला आहे. मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरून वडापाव, समोसे-भजी गायब होणार आहे. मुंबईची ओळख असलेल्या या स्ट्रीट फूडवर आता संकटाचे सावट पसरले आहे. व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांचा लाडका वडापाव, गरमागरम समोसे आणि भजी रस्त्यांवरून गायब होऊ लागली आहेत. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सामान्य कामगारांची भूक भागवणारे हे पदार्थ गॅसअभावी मिळणे कठीण झाले आहे.

