पालघर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागले आहे. गॅसच्या तुटवड्यानंतर आता पालघर शहरात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील दोन्ही मुख्य पेट्रोल पंपांवर इंधन साठा संपल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून, पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले’चे फलक झळकले आहेत.
आज सकाळपासूनच पालघर शहरात इंधनाचा खडखडाट जाणवत होता. पालघर-बोईसर मार्गावरील औद्योगिक वसाहतीसमोरील हिंदुस्तान पेट्रोलियम चे पेट्रोल पंप आणि शहरातील भारत पेट्रोलियम पंप या दोन्ही ठिकाणी इंधनाचा साठा संपला आहे. सकाळी दोन्ही पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला होता, तर दुपारनंतर पेट्रोलही संपल्याने पंपांवर बॅरिकेड्स लावून सेवा बंद करण्यात आली. यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि वाहनचालकांना रिकाम्या हाती परतावे लागले. केवळ पालघर शहरच नव्हे, तर नजीकच्या उमरोळी येथील पेट्रोल पंपावरही डिझेल संपल्याने अवजड वाहतूक आणि शेतीकामांवर परिणाम झाला आहे. गॅस टंचाईनंतर आता पेट्रोल-डिझेलचाही मोठा तुटवडा होणार असून दरवाढ होणार असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली होती. या भीतीपोटी काल (मंगळवारी) रात्री पालघर येथील भारत पेट्रोलियमच्या पंपाबाहेर रात्री दीड वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पालघरमधील भारत पेट्रोलियमच्या वितरक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

