मुंबई : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सेक्टर ६ मधील पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याआधी येथील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन रहिवाशांना सार्वजनिक सूचनेद्वारे करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी झोपड्या हटवून त्या जागेवर नव्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पाअंतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या जागेवरही कामाला सुरुवात झाली असून, येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्याबरोबरच धारावीकरांसाठी पुनर्वसन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेला आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकल्पात ‘की टू की’ म्हणजेच जुन्या घराच्या बदल्यात थेट नवीन घराची चावी देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जागा मोकळी करणे आवश्यक असल्याने सेक्टर ६ मधील सुमारे ३५ एकर परिसरातील झोपड्या रिकाम्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गणेशनगर–मेघवाडी, एसव्हीपी नगर, आजाद नगर (अ, ब, क) तसेच कमला रमण नगर येथील रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. रहिवाशांनी वेळेत घरे रिकामी न केल्यास प्रकल्पात विलंब होऊन त्याचाच फटका त्यांना बसेल, असा इशाराही देण्यात आला आहे. स्थलांतरासाठी रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे किंवा घरभाड्याचा पर्याय देण्यात येणार असून, घर रिकामे करण्यासाठी ५ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. तसेच भाडे पर्याय निवडणाऱ्यांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत दरवर्षी ५ टक्के वाढीसह भाडे दिले जाणार आहे. स्थलांतर प्रक्रियेसंदर्भातील शंका दूर करण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्प येथे विशेष सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले असून, रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

