पुणे : जागतिक स्तरावर वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलपासून तयार केलेले नवे मिश्र इंधन बाजारात आणले आहे. या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षा प्रतिलिटर २० रुपयांनी कमी ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या इंधन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ऊस आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. देशाच्या जैवइंधन क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भारतीय साखर व जैवऊर्जा उत्पादक संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघटनेचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, देशातील प्रमुख तेल वितरण कंपन्यांनी या इंधनाच्या पुरवठ्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या नव्या इंधनाचा वापर वाढण्यास चालना मिळणार आहे.
मिश्र इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वापरालाही वेग येत आहे. देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी अशा प्रकारची वाहने बाजारात आणली असून भविष्यात त्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या वाहनांची विक्री एकूण विक्रीच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास दरवर्षी ३२१ कोटी लिटर इथेनॉलची मागणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. तसेच वातावरणातील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात ६६.४ लाख टनांनी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय साखर व जैवऊर्जा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी हा निर्णय शेतकरी, ग्राहक आणि जैवइंधन उद्योगासाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.१२ रुपये असताना या नव्या मिश्र इंधनाची किंमत ८२.१२ रुपये ठेवण्यात आली असून ग्राहकांना प्रतिलिटर २० रुपयांची थेट बचत होणार आहे.
