कल्याण : सायबर गुन्हेगारांनी लोकांना घाबरवून आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, कल्याणमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘डिजिटल अटक’, दहशतवाद आणि तपास यांचे खोटे भय दाखवत पाच भामट्यांनी एका ८२ वर्षीय आजीकडून तब्बल ७३ लाख ३० हजार रुपये उकळले आहेत. रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी (८२) असे तक्रारदार आजींचे नाव असून त्या कल्याण पश्चिमेतील सिंडीकेट मुरबाड रोड परिसरातील एका गृहसंकुलात राहतात. ६ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. ६ एप्रिल रोजी ‘विजय खन्ना’ नाव सांगणाऱ्या एका इसमाने मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याचे इतर चार साथीदार आळीपाळीने फोन करून स्वतःला तपास यंत्रणेशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवत होते. त्यांनी अत्यंत विश्वासार्ह आणि दबाव टाकणाऱ्या पद्धतीने संवाद साधत आजींना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ केले.
या भामट्यांनी आजींना सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील दहशतवादी पाकिस्तानचा सैनिक असून त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आहे. त्या दहशतवाद्याने काही संशयास्पद बेनामी आर्थिक व्यवहार केले असून त्या व्यवहारांमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा संबंध आढळला आहे, त्यामुळे तुम्हीही संशयित आहात आणि तुमच्या बँक खात्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. “तुमच्यावर कारवाई होऊ शकते, अटक होऊ शकते,” अशी भीती दाखवत त्यांनी आजींना पूर्णपणे घाबरवून टाकले. तपासाच्या नावाखाली त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांचे तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवले आणि त्या खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. भीतीपोटी आणि स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याच्या हेतूने आजींनी आरटीजीएस व इतर ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने एकूण ७३ लाख ३० हजार रुपये या भामट्यांच्या खात्यांमध्ये पाठवले. पाच दिवस सतत फोन, संदेश आणि दबावाखाली ठेवून ही संपूर्ण फसवणूक करण्यात आली. काही दिवसांनंतर हा प्रकार त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगितला असता, त्यांना आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’, ‘तपास’, ‘दहशतवाद’ यांसारख्या गंभीर विषयांचा गैरवापर करून नागरिकांना फसवण्याचे प्रकार वाढत असल्याने, अनोळखी कॉल्स, संदेश किंवा स्वतःला अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये आणि अशा संशयास्पद बाबी त्वरित पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

