नवी दिल्ली : दिल्लीतील नागरिकांना जुने कपडे टाकून देण्याऐवजी त्यांचे पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीसाठी दान करता यावे, या उद्देशाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने ‘अर्पण’ संकलन केंद्रांचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत दिल्ली मेट्रोच्या १० स्थानकांवर विशेष संकलन केंद्रे उभारण्यात येणार असून, नागरिकांना येथे आपले जुने आणि वापरलेले कपडे जमा करता येणार आहेत. या उपक्रमाच्या प्रारंभासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत डीएमआरसी, डीएमआरसी लेडीज वेल्फेअर ऑर्गनायझेशन, राज्य शहरी उपजीविका अभियान, वस्त्रोद्योग पुनर्वापर क्षेत्रात कार्यरत ‘क्लोथ्स बॉक्स फाऊंडेशन’ आणि ‘रेस्पन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, या योजनेचा मुख्य उद्देश वापरलेले कपडे थेट कचरा डेपोमध्ये जाण्यापासून रोखणे, वस्त्रोद्योगातील कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि पुनर्वापराद्वारे चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे. या माध्यमातून केवळ पर्यावरण संरक्षणालाच हातभार लागणार नाही, तर नागरिकांनाही स्वच्छ आणि शाश्वत दिल्ली उभारण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. वाढत्या वस्त्रकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या वापरण्यायोग्य कपड्यांपासून स्वयंसाहाय्यता गटांच्या माध्यमातून बॅगा, सजावटीच्या वस्तू आणि इतर उपयुक्त साहित्य तयार केले जाणार आहे. तर वापरण्यायोग्य नसलेले किंवा अधिक खराब झालेले कपडे पुनर्प्रक्रिया करून त्यापासून नवीन उत्पादने तसेच विविध उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वस्त्रकचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पुनर्वापर उद्योगालाही चालना मिळणार आहे. ‘अर्पण’ संकलन केंद्रे शाहदरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, मालवीय नगर, हौझ खास, द्वारका, मोहन इस्टेट, लाजपत नगर, मयूर विहार फेज-१, पंजाबी बाग वेस्ट आणि शालीमार बाग या १० दिल्ली मेट्रो स्थानकांवर उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर नागरिकांना दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत जुने कपडे दान करता येणार आहेत. पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम राजधानीत शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

