नवी दिल्ली : परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील सीमा विवादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनचे वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून संपर्कात आहेत. LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. चीनसोबत अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. पेट्रोलिंगवर सहमती झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला आहे. अहवालानुसार हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघर्षाच्या या दोन्ही ठिकाणी (डेपसांग आणि डेमचोक) गस्त सुरू झाली असून लवकरच दोन्ही देश आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात करतील, याला लष्करी भाषेत डिसेंगेजमेंट म्हणतात. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव दोन्ही देशांमध्ये गस्त व्यवस्थेबाबत झालेल्या करारामुळे हळूहळू निवळत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांकडून देण्यात आली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, LAC वर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सैनिकांना माघार घ्यावी लागली आहे. चीनसोबतचे अनेक प्रश्नही सोडवण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेचीही माहिती दिली. त्यात संस्थापक सदस्यांसोबतच नवीन सदस्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.
22 ऑक्टोबरपासून शिखर परिषद सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नेत्यांसाठी डिनर असेल. शिखर परिषदेचा मुख्य दिवस 23 ऑक्टोबर आहे. दोन मुख्य सत्रे असतील. तर सकाळच्या सत्रानंतर, शिखर परिषदेच्या मुख्य विषयावर दुपारी खुले सत्र होईल. नेत्यांनी कझान घोषणेचा अवलंब करणे देखील अपेक्षित आहे. ज्यामुळे ब्रिक्सचा मार्ग मोकळा होईल. 24 ऑक्टोबरला शिखर परिषद संपणार आहे.
चीनसोबतच्या सीमावादाची ही माहिती ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या रशियातील कझान शहराच्या भेटीच्या एक दिवस आधी आली आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठकाही घेऊ शकतात. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढायला गेलेल्या काही भारतीयांची माहितीही परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना बेकायदेशीरपणे किंवा इतर मार्गाने रशियन सैन्यात लढण्यासाठी पाठवण्यात आले आहे, त्यांच्याबाबत आमच्या दूतावासाचे अधिकारी या प्रकरणाबाबत रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. सुमारे 85 लोक रशियामधून परतले आहेत. सुमारे 20 लोक बाकी आहेत.