पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना ‘नाथजल’ची एक लिटर पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांतच उपलब्ध करून द्यावी, अन्यथा अधिक दराने विक्री करणाऱ्यांचा परवाना थेट रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी त्यांनी लोणावळा बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी काही प्रवाशांनी ‘नाथजल’ची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याची तक्रार केली. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत तात्काळ दरफलक लावण्याचे निर्देश दिले आणि पुढे नियमभंग झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.
याच दौऱ्यात प्रवाशांनी काही बसफेऱ्या स्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच बसेस खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जात असल्याची तक्रार मांडली. यावर “कोणतीही एसटी बस खाजगी हॉटेलवर थांबणार नाही, सर्व बसेस नियोजित वेळापत्रकानुसार स्थानकातच थांबल्या पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले. यावेळी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे, तिकीट व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत एसटी सेवेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

