ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी दादरमध्ये ‘टोरेस’ कंपनीने अनेक सामान्य नागरिकांना लाखोंचा गंडा घातला. ही बातमी ताजी असतानाच आता कल्याणमध्ये एका कंपनीने सामान्य नागरिकांना गंडा घातला आहे. कल्याणमध्ये, ‘ज्यू पीडिया’ नावाची एक कंपनी आहे, जी कंपनी सामान्य नागरिकांना आकर्षक मोबदला आणि मोठ्या नफा देते. आकर्षक मोबदला आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून कंपनीने अनेक गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. जर ग्राहकांनी, कंपनीने दिलेले ऑनलाईन टास्क पूर्ण केले तर त्यांना प्रचंड कमाई मिळेल, असे खोटे आश्वासन देत लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली.
तक्रारदारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “कल्याणमधील ‘ज्यू पीडिया’ नावाच्या कंपनीने लोकांना टास्कच्या माध्यमातून पैसे देत होते. जर लोकांनी कंपनीने दिलेला टास्क पूर्ण केला तर त्यांना ते पैसे मिळत होते. लेव्हल अपग्रेडच्या माध्यमातून हे पैसे लोकांना मिळत होते. लेव्हल १ पासून लेव्हल ९ पर्यंत होते. १९५० रूपये भरून लोकं कंपनीमध्ये रजिस्टर्ड करत होते. रजिस्टर्ड केल्यानंतर वर्षभर लोकांना ६५ रूपये दिवसाला पैसे मिळत होते. असं प्रत्येक लेव्हलला पैसे वाढत जात होते. त्याप्रमाणे पैसे वाढत होते.” “कंपनी आपल्या ग्राहकांना फंड आणि इतरत्र पैसेही देत होते. पण ते त्यांच्या वॉलेटमध्येच सेव्ह होते. ते पैसे लोकांना मिळत नव्हते. ते पैसे लेव्हल अपग्रेड केल्यानंतरच मिळतील. मी लेव्हल ५ पर्यंत अपग्रेड केली होती. त्यामुळे मला दिवसाचे ६७०० रूपये भेटायचे, ते पण त्यांच्या वॉलेटमध्येच जमा होत होते. हातावर पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांनीही या कंपनीमध्ये पैसांची गुंतवणूक केली होती. अनेक लोकांची फसवणूक झाल्यामुळे बरेच लोकं संतापले आहेत. “, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली आहे. कल्याणमध्ये ‘ज्यू पीडिया’ नावाच्या कंपनीने आपलं कार्यालय थाटले. गरजू लोकांना कंपनीने आकर्षक मोबदला आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
लाखो रुपये कमवायची शक्कल लढवत गरजवंतांना हेरून कंपनीचे कथित एजंट ग्राहकांना आकर्षक विविध ऑनलाइन टास्क देत या टास्कमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंचा फायदा होईल, नऊ लेव्हल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल असे आमिष दाखवत होते. या कंपनीची सी.ई.ओ. सुषमा पालकर नावाची महिला होती. तिच्यासोबत लिली आणि जॅक नावाच्या दोन व्यक्ती कंपनीच्या ग्रुपवर सक्रिय होते. कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचे वॉलेट तयार केले. तयार केलेल्या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेले पैसे आणि टास्क पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता. मात्र अनेक महिने उलटून गेले हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कंपनीकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं देत टाळाटाळ केली जात होती. अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी थेट कथित सी.ई.ओ. सुषमा पालकर यांना गाठले मात्र त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली. अखेर या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली. बाजारपेठ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचार्यांीवर आणि सीईओवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,, ‘ज्यू पीडिया’ कंपनीने किती जणांची लूटमार केली आहे, अद्याप ही माहिती समोर आलेली नाही.

