मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील रिक्षा व काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ लागू होणार असून, या प्रस्तावाला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची वाढ करण्यात आली असून, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ते ३१ रुपयांवरून ३३ रुपये करण्यात आले आहे. ही दरवाढ केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित नसून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या एमएमआरमधील परिसरातही लागू होणार आहे. त्यामुळे या भागांतील प्रवाशांना १ सप्टेंबरपासून वाढीव भाड्यानुसार प्रवास करावा लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या इंधन दरांचा, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च, विमा, परवाने आणि इतर प्रशासकीय खर्च वाढल्यामुळे भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन आयुक्तांनी २० ऑगस्ट रोजी भाडेवाढीचा प्रस्ताव एमएमआरटीएकडे पाठवला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता नव्या दरांची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार आहे.
दरम्यान, या भाडेवाढीला काही प्रवासी संघटना आणि प्रवासी हक्क कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मते, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर आधीच घरखर्च, अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य आणि वाहतुकीचा वाढता आर्थिक भार आहे. अशा परिस्थितीत रिक्षा-टॅक्सी भाड्यातील वाढ ही दररोज सार्वजनिक वाहतुकीसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण करणारी ठरेल. सध्याचे किमान भाडे पुरेसे असल्याचा दावा करत ही वाढ पुनर्विचार करण्याची मागणीही काही संघटनांनी केली आहे. दुसरीकडे, चालक संघटनांनी वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. वाहनांच्या देखभाल, सुटे भाग, विमा हप्ते, परवाना शुल्क आणि इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने जुन्या दरांमध्ये व्यवसाय करणे कठीण झाले होते, असा त्यांचा दावा आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी पुन्हा भाडेवाढ लागू होत असून, येत्या १ सप्टेंबरपासून एमएमआरमधील लाखो प्रवासी आणि हजारो रिक्षा-टॅक्सी चालक नव्या भाडेदरांनुसार व्यवहार करणार आहेत.
