मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. दादर येथील चैत्यभूमी परिसरात आज लाखो अनुयायांच्या उपस्थितीत अभिवादनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार असून, राजगृह आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार तसेच महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी हे सकाळी ९.३० वाजता चैत्यभूमीवर पुष्प अर्पण करून अभिवादन करणार आहेत. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नियंत्रण कक्ष यांसारख्या मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्या असून, सीसीटीव्ही देखरेख, समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका यांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार असून, चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आणि कॉफी टेबल बुक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून केले जाणार आहे.
दरम्यान, जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. दादर–चैत्यभूमी परिसरातील एस.व्ही.एस. रोड, रानडे रोड आणि ज्ञानेश्वर रोड हे मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून, एस.के. बोले रोडवर एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. तसेच महामार्गावरून येणारी जड वाहने माहीम जंक्शनमार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत. हे सर्व निर्बंध १३ एप्रिल दुपारी ११ वाजल्यापासून १४ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. मोठ्या संख्येने अनुयायी येण्यामुळे दादर, शिवाजी पार्क आणि माहीम परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आणि पर्यायी मार्ग निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले कायदेतज्ञ, अर्थतज्ञ आणि समाजसुधारक होते. समता, सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांसाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत आहेत.

