मुंबई : निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले असून मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याची जुनीच मागणी भाजपच्या नगरसेविकेने पुन्हा एकदा केली आहे. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी याबाबतची ठरावाची सूचना मंजूर झाली होती. त्याची गेल्या तीन वर्षात अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सभागृहाच्या ठरावानुसार महापालिकेच्या सर्व शाळांमधून भगवद्गीता पठण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला द्याव्यात अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविकेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मालाडमधील भाजपच्या माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या शाळांमधून भगवद्गीता पठण केले जावे जेणेकरुन भावी पिढीवर योग्य संस्कार होतील, अशा प्रकारची ठरावाची सूचना मांडली होती. पालिकेची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी झालेल्या पालिका महासभेत ही ठरावाची सूचना मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर पालिका संपुष्टात आली व नंतर तीन वर्षे पालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. दरम्यान, योगिता कोळी यांनी मार्च २०२३ मध्ये तत्कालिन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिका शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याबाबत पत्र दिले होते.

