मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर पथकर नाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे दहिसर पथकर नाका तेथून पुढे दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा पथकर नाका शहराच्या आत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा पथकर नाका दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक पथकर नाके रद्द केले. तसेच सर्व पथकर नाक्यावरील लहान वाहनांना पथकर माफ केला. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले. दहिसर पथकर नाक्यामुळे मीरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

