मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या सुमारे ८१ लाख महिलांपैकी तब्बल ६२ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या पात्रता निकषांमुळे लाभ बंद होण्याच्या भीतीने अनेक महिलांनी ई-केवायसीच केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पात्र असलेल्या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. तटकरे यांनी सांगितले की, योजनेतील कोणाचाही अर्ज थेट बाद करण्यात आलेला नाही. मात्र वय, उत्पन्न आणि इतर पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली आहे. तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, त्यांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळाली आहे. काही अर्जदार इतर शासकीय योजनांचे लाभार्थी असल्याचेही तपासणीत आढळून आले आहे. याशिवाय, अनेक महिलांनी विहित कालावधीत ई-केवायसी पूर्ण न केल्याने त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील कोणत्याही पात्र महिलेला योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याचे तटकरे यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभाग सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ई-केवायसी पूर्ण न केलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या सुमारे ८० लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आले असून छाननीनंतर सुमारे १.६८ कोटी महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा लाभ दिला जात आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही लाभ स्थगित झाला आहे, तसेच इतर योजनांसह लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबलेल्या लाभार्थींनी तातडीने महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा सर्व प्रकरणांची पुन्हा पडताळणी करून पात्र लाभार्थींना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही अदिती तटकरे यांनी दिली आहे.

