मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे शिक्षकांचे वेतन रखडत असल्याची समस्या कायम असतानाच आता आणखी एका नव्या कारणाची भर पडली आहे. बँकेचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन रोखण्यात येणार असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यभरातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरू असताना अनेक शिक्षकांना निवडणूक कामांसाठीही नेमणुका देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेची अट घालून वेतन रोखण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. वारंवार वेगवेगळ्या कारणांवरून वेतन अडवणे हे नियमबाह्य असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान, २२ एप्रिल २०२६ रोजी वित्त विभागाच्या अधिदान व लेखा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार शालार्थ आणि सेवार्थ प्रणालीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांच्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांना आदेश देत, ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय पुढील महिन्याची वेतन देयके सादर करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. तसेच, वेतन देयकासोबत ई-केवायसी अर्जाची मूळ प्रत जोडणेही आवश्यक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता न केल्यास एप्रिल २०२६ मधील वेतन मे महिन्यात वितरित केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांची धावपळ सुरू झाली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी जोर धरत आहे.
