ठाणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनगणना २०२७ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात पूर्वतयारीला वेग आला आहे. या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील नऊ चार्ज अधिकारी कार्यालयांमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण सत्रांना सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात घरयादी (House Listing) आणि घरगणना प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, संपूर्ण कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने मोबाईल ॲपचा वापर, डेटा संकलनाची अचूक पद्धत आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर भर देण्यात येत आहे.
प्रशिक्षणामध्ये केवळ सैद्धांतिक माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करताना कोणतीही अडचण येऊ नये. हाउस लिस्टिंग ब्लॉक (HLB) तयार करण्याची पद्धत, प्रश्नावलीचे सोपे सादरीकरण, तसेच संकलित माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरयादी आणि घरगणना मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्वंकष तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जनगणना ही देशाच्या विकासाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच ‘Self Enumeration’ (स्व-गणना) या सुविधेचाही जास्तीत जास्त वापर करावा.

